रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश लपवू शकत नाही असा टोला रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

“करोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची देखील आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये,” असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

“करोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. देशात करोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन; रेमडेसीवीरसह सर्व औषधांचा पुरवठा करत आहे. राज्य सरकारने करोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

“मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे. करोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे,” असा आरोप रामदास आठवले यांनी केला.