पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन सुरु असताना करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. नरेंद्र मोदी यांना यावेळी मुख्यमंत्र्यांना करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज असल्याचं सांगितलं. तसंच नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुढील आठवडा सर्व लक्ष करोनाची लागण झालेल्यांची माहिती मिळवण्यामध्ये, तसंच त्यांना घरात किंवा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यावर असलं पाहिजे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला. हा सल्ला नरेंद्र मोदींनीही लगेच मान्य केला.

उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सल्ला दिला की, सर्व धर्मगुरुंना मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करु नका असं सांगितलं पाहिजे तसंच सोशल डिस्टनस्गिंचं पालन करा अशी सूचना केली पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा हा सल्ला मान्य करत लॉकडाउनदरम्यान लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याचं समर्थन केलं. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. लॉकडाउनचा काळ संपला म्हणजे सगळं काही संपलं असं नसून ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी अधोरेखित केलं. तसंच ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत असंही सांगितलं.

आणखी वाचा- राज्य सरकारकडून पोलिसांना संरक्षण; कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५० लाखांची मदत

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या सूचना कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.

१. लॉकडाऊन संपवल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पहावे.

२. देशात आत्तापर्यंत आपण करोनाला रोखण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे सगळे संपले असं नाही.  आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.

३. करोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वैगेरे तंत्रज्ञनाचा उपयोग करा.

४.  करोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ, यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने  संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळेल पण करोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल. यावेळी ग्रामीण भागात गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी  वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

९. ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहेत. आपणही काळजी घेतली पाहिजे पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.