करोनाशी लढण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, तरीही अनेक लोक घराबाहेर पडत आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. पत्रकारांच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपली भुमिका मांडली. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. सध्याच्या काळात समाजाची मोठी जबाबदारी आहे. आपल्याला नुसतं यंत्रणांना दोष देऊन चारणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “काही जण खरंच काही महत्वाचं काम असतं म्हणून घराबाहेर जात असतात. पण काही जण याचा गैरफायदाही घेत आहेत. असे लोक सध्या मेडिकलची खोटी सर्टिफिकेट घेऊन घराबाहेर फिरत आहेत. या दिवसातं हे असं वागणं बरं नाही. त्यामुळेच समाजातील सर्वांचीच ही जबाबदारी आहे की त्यांनी या सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. नुसतंच यंत्रणांना दोष देऊन चालणार नाही.”

आणखी वाचा- पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढा आणि त्यांचे व्हिडीओ व्हायरल करा – राज ठाकरे

“बाकीचे आपापल्या जबादाऱ्या पार पाडतातच आहेत. पण समाजाचं याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. समाजानं नुसतं सुशिक्षित असून उपयोग नाही, सूज्ञ पण असावं लागतं.”, अशा शब्दांत राज यांनी नियम तोडणाऱ्या सुशिक्षित लोकांना सुनावलं देखील आहे.

आणखी वाचा- मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे – राज ठाकरे

“भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याकडे सरकारने याची व्यवस्थित व्यवस्था लावायला पाहिजे. त्याचबरोबर पोलिसांवर ताण आणू नका. लोक शिस्त पाळत नाहीत त्यामुळे त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतयं. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी त्यांच्यावर टीका करुन त्यांचं मनोधैर्य आज खच्ची करुन तुम्हाला चालणार नाही,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.