राज्यातील करोनाची दुसरी लाट आत ओसरताना दिसत आहे. शिवाय, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही करोनामुळे रूग्णांचे मृत्यू सुरूच आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५ हजार ८९० रूग्ण करोनामुक्त झाले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के झाले आहे. तर, राज्यात आज ९ हजार ८३० नवीन करोनाबाधित आढळले असून, २३६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

याचबरोबर, राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,३९,९६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात घरोघरी लसीकरण: पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य

तर, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीजास्त लसीकरण तसेच घरोघरी लसीकरणाची भूमिका राज्य कृतीदलाने घेतली आहे. तसेच लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे अग्रक्रमाने लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.