तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात आली आहे. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे असं मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटलं आहे.

तबलिगी जमात भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याने तसेच पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं शमसुद्दिन तांबोळी यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

राज ठाकरे यांनी “तबलिगला कसले वैद्यकीय उपचार देताय, त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे” असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा भीती निर्माण झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत. “सर्वसामान्य मुस्लिमांची असुरक्षितता वाढत असतानाच, करोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तबलिगी जमातने ताबडतोब तोबानामा (माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

आणखी वाचा- मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क करा, अन्यथा कठोर कारवाई – मुंबई महापालिकेचा इशारा

“येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. यानिमित्त लोक मस्जिदमध्ये नमाज अदा करतात आणि कब्रस्तानात जाऊन प्रार्थना करत असतात. पंधरा दिवसावर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लीम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपवास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज अदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट-अलिंगन दिले जाते. हे सर्व  करोना विषाणु पसरवण्यात आणि करोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. करोना संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा  आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवावे. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.