करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करत आहेत, प्रशासकीय पातळीवरून ते आदेशही देण्यात आले आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारीच सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचं पालघरमधील तलासरीच्या तहसीलदारांनी केलेल्या कृत्यातून दिसून आले आहे.

लॉकडाउननंतर जे कामगार गुजरात आणि राजस्थानकडे पायी निघालेत होते. मात्र या कामगारांसाठी गुजरात राज्याने सीमा बंद केल्यानंतर त्यांना तिथेच थांबण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. यानंतर पालघरच्या जिल्हा प्रशासनाने या स्थालांतर करणाऱ्या नागरिकांची हंगामी निवासाची व्यवस्था केली आहे. मात्र तलासरीच्या तहसीलदारांनी शासकीय गोदामांतून रेशनिंगच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये तब्बल ५६ नागरिकांना कोंबून डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेत हलविले.

यामुळे तहसीलदारांनीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजवले असा आरोप होऊ लागला आहे. या ५६ नागरिकांमध्ये दोन महिला आणि लहान मुलांचा समावेश असून या सर्व प्रकाराकडे पाहिल्यानंतर प्रशासनच सोशल डिस्टंसिंगचा आदेश पाळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसमोर कोणतं उदाहरण  ठेवणार हा प्रश्न केला जात आहे.