करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. राज्यामध्येही संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जिल्ह्यांच्या सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र असं सगळं असतानाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करुन आपल्या गावी जाण्यासाठी दोन तरुणांनी आपल्या जिवंत काकीला पांढऱ्या चादरीत गुंडाळून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी हे नाटक बरोबर ओळखलं आणि मुंबईतील या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने घाबरलेल्या दोन तरुणांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भरणे नाका येथील नाकाबंदीला पोलिसांनी या तिघांना आडवलं. त्यावेळी या तरुणांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आपल्या काकीचा मृत्यू झाला आहे असं सांगून पोलिसांपुढे हात जोडून जाऊ देण्याची विनंती केली. त्यावेळी ऑन ड्युटी असणारे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना या मुलांवर शंका आली. खरोखर या महिलेचा मृत्यू झाला आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी घरी व्हिडिओ कॉल लावण्यास सांगितला. संबंधित तरुणांच्या घरचे देखील या नाटकामध्ये सहभागी असल्याने त्यांनाही पोलिसांना महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितलं. व्हिडिओ कॉलदरम्यान पोलिसांसमोर या महिलेला पांढऱ्या कपड्याने गुंडाळून ठेवण्यात आलं होतं. ही महिला पोलिसांसमोर मृत असल्याचे नाटक करत होती. मात्र पोलिसांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता अखेर त्यांनी गावातील पोलीस पाटलाल फोन करुन चौकशी करण्यास सांगितले आणि काही वेळातच या तिघांचे बिंग उघडं पडलं. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची दुचाकीही जप्त केली आहे. या दोघांनाही खेडमध्येच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

आहात तिथेच सुरक्षित राहा असा संदेश अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच केली असली तरी लोक घराबाहेर पडून गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यामध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याने अगदी रेल्वे ट्रॅकपासून दुधाच्या गाड्यांपर्यंत वेगवगेळ्या युक्त्या वापरत आहेत.