भारतीय माणूस हा उत्सवप्रिय व समाजशील आहे. कठोर विलगीकरण हा त्याच्यासाठी उपाय ठरू शकत नाही. घरालगत विलगीकरण करण्याचे उपाय अंमलात आणल्याखेरीज करोनावर नियंत्रण शक्य नाही, असे मत प्रसिध्द शल्य चिकित्सक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी नोंदविले आहे.

करोनाबाधित पण सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णास घरीच विलगीकरणात ठेवण्याचे धोरण अंमलात येत आहे. मात्र नागरिक विलगीकरण टाळत असल्याने संक्रमण वाढत असल्याची शासनाची धारणा झाली. या पार्श्वभूमीवर विलगीकरणातील रूग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्याला दोन ते दहा हजार रूपयाचा दंड राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात आकारल्या जात आहे. दंड परवडला पण विलगीकरण नको, अशा मानसिकतेतील रूग्णांना आवर घालणे हे एक प्रश्नाचिन्हच ठरले आहे. सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशॅलिटी रूग्णालयाचे करोना केंद्र मार्गदर्शक व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी लोकसत्ताशी बोलतांना काही अभिप्राय नोंदविले आहे. गत ३५ वर्षांपासून वैद्यकीय श्रेत्रात कर्यरत डॉ. श्रीवास्तव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पाक्षिकांमध्ये लेखन करीत असतात.

डॉ. श्रीवास्तव म्हणतात, की करोनाने एक मोठा धडा आपल्याला शिकविला आहे. आरोग्याच्या सोयी घरापासून दूरवर असणे निरूपयोगी ठरतात. प्राथमिक उपचाराच्या सोयी जवळपास नसल्याने करोना आवाक्याबाहेर गेला आहे. तसेच आपले राहते घर विलगीकरणासाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. स्नानघर व अन्य कामासाठी कुटूंब एकत्रच असते. मुख्य म्हणजे आपली मानसिकता विलगीकरणात राहण्याची नाही. तरीही विलगीकरणाचे दडपण या काळात आले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने निवासी परिसरातच सार्वजनिक किंवा खासगी इमारत ताब्यात घेवून विलगीकरणाची सुविधा देण्याची शक्यता हवी. रूग्ण तपासणीची व्यवस्था स्थानिक पातळीवरच हवी. अधिकाधिक रूग्ण आढळणाऱ्या क्षेत्राला प्रतिबंधित करून त्याच ठिकाणी करोना केअर केंद्र सुरू करावे. त्याच परिसरातील स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरगुती जेवण, कपडेवगैरे सुविधा पुरवावी. यामूळे अलग पडल्याची भावना दूर होईल. अशा व्यवस्थेतील रूग्णास जुजबी स्वरूपाचे काम द्यावे. ऑनलाईन शैक्षणिक व कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. संक्रमणाची भिती दूर करणे आवश्यक आहे. करोनाला भिऊ नका, उपायांचा अंमल करा, असा संदेश देण्याची गरज असल्याचे डॉ. श्रीवास्तव म्हणतात.

विसावे शतक जिवाणूंचे तर एकविसावे शतक विषाणूंचे राहणार, असे मत नोंदवित डॉ. श्रीवास्तव म्हणतात की करोनाच्या पाश्र्वाभूमीवर एकूणच आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देण्याची गरज आहे. दहा हजाराच्या लोकसंख्येत बाळ व माता उपचार तसेच अलगीकरणाची सोय असणारे केंद्र करावे. रोगनिदान प्रयोगशाळेची सोयपण आवश्यक ठरते. प्राथमिक पातळीवर रोगाचे निदान होणे अनिवार्य आहे. करोनाने दूरध्वनी माध्यमातून वैद्यकीय सल्याचा पर्याय पूढे आणला. पण त्याला भारतीय मन सरावलेले नाही. दहा हजार लोकसंख्येमागे ५० डॉक्टर, १५० परिचारिका, १०० खाटा अशी व्यवस्था निर्माण होईल तेव्हाच सर्वसाधारण मृत्यूदर खाली येईल. करोनाचे संकट आल्यावर आपण ऑक्सिजन पाईप व वेन्टीलेटर खाटांसाठी लगबग करू लागलो. ही व्यवस्था पूर्वीच अपेक्षित होती. आताही वेळ गेलेली नाही. विषाणू लवकरच लूप्त होणारा नाही. म्हणून पूर्ण तयारीनिशी विषाणू विरोधातील युध्द लढण्यास सज्ज व्हायला हवे. वैद्यकीय क्षेत्र हे आगामी काळातील रोजगाराचे सर्वात मोठे साधन ठरणार आहे. या क्षेत्रात केवळ डॉक्टरच हवे असे नसून औषधी निर्माणशास्त्र, प्राथमिक उपचार, संशोधक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्यबळ, वित्तीय व्यवस्थापन, शुश्रूषा, वैद्यकीय यंत्र हाताळणी व अन्य स्वरूपात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. रोजच रोजगाराच्या शेकडो संधी उपलब्ध करून देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचा युवकांनी अवश्य विचार करावा, असे आवाहनही डॉ. श्रीवास्तव यांनी केले आहे.