श्रीरामपूर बस स्थानकाजवळील हॉटेल नीलायमला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले. महावितरणमध्ये उपअभियंता असलेल्या सतीश व्ही. कुलकर्णी (वय ५६) आणि त्यांची पत्नी सुमित्रा कुलकर्णी यांचा आगीमध्ये मृत्यू झाला.
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास नीलायम हॉटेलला आग लागली. कुलकर्णी दाम्पत्य याच हॉटेलमध्ये उतरले होते. सतीश कुलकर्णी यांची श्रीरामपूरमध्ये बदली झाली होती. तिथे राहण्यासाठी घर निश्चित झाले नसल्यामुळे ते पत्नीसह हॉटेलमध्ये उतरले होते. आगीत सापडल्यामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
पहाटे लागलेली आग सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांना यश आले. श्रीरामपूरमधील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्तात्रय सानप यांच्या मालकीचे हे हॉटेल आहे.
(संग्रहित छायाचित्र)