लग्नाचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला एका जोडप्याने चांगलाच धडा शिकवला आहे. नागपूरमधील जलालखेडा गावातील सुरेंद्र आणि अश्विनी निकोसे या जोडप्याने ग्रामसभेत लग्न केले. एका नोंदणीकृत संस्थेच्या कार्यालयात या दोघांचे जुलै महिन्यात लग्न झाले होते.

ग्रामपंचायतीत लग्न प्रमाणपत्रासाठी नोंदणीकृत संस्थेने दिलेली सर्व कागदपत्रं त्यांनी ग्रामसेवकाकजे दिली. मात्र, ग्रामसेवक आनंद लोलुसरे यांनी असं लग्न मान्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नरखेड कोर्टात कोर्ट मॅरेज करुन तिथली कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतरच ग्रामपंचायतीतून लग्न प्रमाणपत्र मिळेल असे सांगत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.

त्यानंतर त्या जोडप्याने आपल्या लग्नाला प्रमाणित करण्यासाठी नरखेडच्या तालुका न्यायालयात लग्न केले आणि ग्रामसेवकाकडे कागदपत्रे सादर केली. तरीही ग्रामसेवक आनंद लोलुसरे यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. ग्रामसेवक प्रमाणपत्रसाठी वेगवेगळी कारणं सांगून अडवणूक करत होता. यामुळे त्रस्त झालेल्या सुरेंद्र आणि अश्विनी यांनी अचानक ग्रामसभेत ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर पुन्हा एकमेकांना हार घालून लग्न केलं. या प्रकारामुळे तिथे उपस्थित अधिकारीही गोंधळले. गावकऱ्यांनी हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर, त्यानंतर ग्रामसेवकाला त्वरित लग्न प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.