राज्यात आज दिवसभरात ४ हजार ५२४ रूग्ण करोनामधून बरे झाले, तर ४ हजार १५४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. याशिवाय, ४४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९९,७६०   करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९१,१७९  झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८०६१ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५७,०२,६२८  प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६४,९१,१७९ (११.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९६,५७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९,८१२  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.