सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आवश्यक 

पुणे : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किं चित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. करोना संसर्गाच्या कालावधीत राज्यात एका दिवशी सर्वोच्च सुमारे २३ हजार रुग्ण सापडले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही संख्या ३६४५ पर्यंत खाली आली होती. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन ऑक्टोबरच्या शेवटी दररोजच्या रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत गेली आहे.

राज्यात २६ ऑक्टोबरला एकाच दिवशी राज्यात ३६४५ रुग्ण आढळले होते. २७ ऑक्टोबरला ५३६३, २८ ऑक्टोबरला ६७८३ तर २९ ऑक्टोबरला ५९०२ रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. ३० ऑक्टोबरला दिवसभरात ६१९० नवीन रुग्ण आढळले. ३१ ऑक्टोबरला ही संख्या ५५४८ एवढी होती. शेवटच्या आठवडय़ात वाढलेली ही संख्या चिंतेची असल्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढ बघता दिवाळी साजरी करतानाही करोनाची साथ संपलेली नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे अशी सूचना डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा करत आहेत.

राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, राज्यात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या काही काळ कमी झाल्यानंतर नागरिकांचे सर्व प्रकारचे व्यवहार पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सव, नवरात्र या काळात करोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवण्यात आले. दिवाळीच्या निमित्तानेही तेच होताना दिसत आहे. त्यामुळे दुसरी लाट येणार याबाबत कोणतीही शंका नाही. हिवाळ्यात विषाणूजन्य रोगांचा प्रसार वेगाने होतो हे अनेक साथींबाबत दिसून येते. मात्र, नागरिकांचे वर्तन पाहता संसर्गाच्या प्रसाराचे खापर हिवाळ्यावर फोडावे लागणार नाही, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट के ले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, सप्टेंबरच्या मध्यवर्ती काळात राज्यात आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या २३ हजापर्यंत जाऊन आली.

त्यामुळे त्या वेळी असलेली लाट ओसरली, मात्र पुन्हा दिसणारी रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. पर्यटनापासून कार्यालयीन कामकाजापर्यंत अनेक गोष्टी पूर्ववत झाल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात लोकलसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपासून दुसरी लाट पाहायला मिळेल असे चित्र आहे, असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.

नियम पाळणे आवश्यकच!

’ खरेदी, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि पर्यटन या निमित्ताने

गर्दी करणे टाळा.

’सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराचा नियम पाळा.

– मुखपट्टीचा वापर अनिवार्य आहे याचे भान ठेवा.

’ तातडीचे कारण नसल्यास घराबाहेर पडू नका.

’आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांची भेट घ्या.

* राज्यात तीस सप्टेंबरला एकाच दिवशी १४,९७६ नवीन रुग्ण आढळले होते.

* १५ ऑक्टोबरला ही संख्या १०,२२६ एवढी झालेली दिसली. १९ ऑक्टोबरला नव्या रुग्णांची संख्या ५ हजारांच्या खाली आली.

* २६ ऑक्टोबरला प्रथमच ती ३६४५ पर्यंत कमी झाली. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला या संख्येत पुन्हा वाढ होऊन ती ५५४८ वर पोहोचली आहे.