राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६० जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ९२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच प्रभाव अद्यापही म्हणावा तसा कमी झालेला दिसत नाही, कारण करोनातून रूग्ण बरे जरी होत असले तरी अद्यापही दररोज करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, कोरनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. राज्यात रोज आढळून येणारी नवीन करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. शिवाय, राज्य शासनाने निर्बंध जरी शिथिल केलेल असले, तरी देखील करोना रूग्ण संख्येत जर पुन्हा पूर्वीप्रमाणे वाढ होऊ लागली, तर पुन्हा एकाद लॉकडाउन लावला जाऊ शकतो. असा देखी इशारा सरकारकडून दिला जात आहे आणि करोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वांनी आवर्जुन पालन करावे असे सांगितले जात आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८६,३४५ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,७७,९८७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७६४३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४४,८७,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,७७,९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,०९८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, १ हजार ९५४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५०,४६६ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.