मुख्यमंत्र्यांची आशा सेविकांना विनंती करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच करोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन करोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. मुलांमधील करोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या कृती गटाच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दूरचित्र संवादाच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या कृती गटाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, सदस्य डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाइन परिषदेत सहभागी झाल्या होत्या. बालरोग तज्ञांच्या कृतीगटाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतानाच करोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती द्या. कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी के ल््या. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.