किरकोळ वादातून पतीकडून पत्नी आणि दोन मुलांची हत्या

किरकोळ वादातून एकाने पत्नीसह दोन मुलांची हत्या केल्याची घटना माणगाव तालुक्यातील दहिवली येथे बुधवारी रात्री घडली. सुहानी शिंदे (वय ३६), पवन शिंदे (वय ५) आणि संचित शिंदे (वय २) अशी मृतांची नावे आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

मोलमजुरी करणाऱ्या शिंदे दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणांवरून नेहमी वाद होत. बुधवारी रात्री दोघांमधील वाद विकोपाला गेला. राग अनावर झाल्यामुळे संतोषने पत्नीसह दोन्ही मुलांची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आरोपी संतोष याला ताब्यात घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संचित शिंदे याला तातडीने माणगावमधील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले.

पोलीस पाटलांकडे कबुली

पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष शिंदे रात्री घरीच झोपी गेला. सकाळी पावणेदहा वाजता त्याने पोलीस पाटील चंद्रकांत चेरफळे यांना घडला प्रकार सांगितला. रोजच्या भांडणाला कंटाळून आपण पत्नी आणि मुलांना ठार मारल्याची कबुली त्याने दिली. पोलीस पाटलांनी त्याच्या घरी जावून खातरजमा केली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.