शहरातील क्रांती चौक ते रेल्वेस्थानक रस्ता दोन वर्षांपासून पूर्ण होऊ शकला नाही. कामात दिरंगाई झाल्याने घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत ठरवून अधिकारी व ठेकेदारांविरोधात महापालिकेने गुन्हा दाखल करावा, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांना केली.
रेल्वेस्थानक परिसरात दररोज वाहतुकीची कोंडी होते. क्रांती चौकातील धोकादायक रस्त्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला. वेळोवेळी खड्डे बुजविण्याची सूचना देऊनही अधिकारी दुर्लक्ष करतात. कालमर्यादेत काम होत नाही, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागते. आम्ही टीकेचे धनी बनतो. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने पावले उचलावीत, असे सांगत खैरे यांनी महापालिका आयुक्तांना सुनावले. स्टेशन परिसरात गटार फुटल्याने दरुगधी पसरली. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना त्रास होतो. रस्त्यावरील विजेचे खांब न हटल्यामुळे अडचण जाणवत आहे. वेळेत काम करा, असे दटावताना शिवसेना स्टाईल धडा शिकवू, असेही त्यांनी काही अधिकाऱ्यांना सुनावले. परिसरातील नागरिकांनीही अपूर्ण कामाच्या तक्रारी आयुक्तांसमोर केल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू. जमीन हस्तांतरणाची कार्यवाहीदेखील तातडीने पूर्ण करावी. त्यासाठी आवश्यक असणारी रक्कमही तातडीने भरावी, असे सांगण्यात आले.