लोप पावत असलेल्या दुर्मिळ वीस औषधी प्रजातीच्या १५० रोपांची लागवड रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वर्ध्यातील ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. लोप पावत असलेल्या दुर्मिळ वनौषधींची लागवड करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. करू, चारोळी, काळाढोमा, सर्पगंधा, पीपल, रिठा, हिरडा, सागरगोटी, अंकोला, पानखुटी, सागांखाती, कृष्ण तुळस, अडुळसा, कपूर कर्सली, देवतरोटा, बावची, निल, गोकर्ण, पुदीना, बहावा, वाळा, खंडूचक्का अशा विविध एकूण १५० जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. केदार जोशी, सुप्रिया जोशी, नंदकुमार कुलकर्णी, ऋतुजा कुलकर्णी, मनीष गांधी, पंकज क्षीरसागर, दिलीप पेठे, अनिल देवतळे, सागर मसराम, प्रमोद खोडे व अन्य उपस्थित होते. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी या उपक्रमाची भूमिका मांडतांना औषधी वनस्पतींची महत्व विशद केले. "या ऑक्सिजन पार्कमध्ये विविध वृक्षांसोबतच अशा दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व मोलाचे ठरणार आहे. करोना काळात काढा घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, नेहमीसाठीच आरोग्य संवर्धन व्हावे म्हणून अशा वनस्पती आता यापुढे सहज उपलब्ध होतील," अशी खात्री बेलखोडे यांनी दिली. सार्वजनिक योगदानातून हा प्रकल्प फुलत आहे हे विशेष.