वाई पालिका प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
मूळ विकासाच्या कामाला बगल देऊन भावनिक आवाहन करुन समाजात अंतर निर्माण करण्याचे काम सुरु आहे. सत्ताकारणाच्या व्यवस्थेतून सर्वसामान्य माणूस बाजूला फेकण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे मत राष्ट्रवादी कॉगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
वाई पालिकेच्या साडेसात कोटी खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक िनबाळकर , आमदार मकरंद पाटील , बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण , प्रभाकर घाग्रे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर,माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर , माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ आदी उपस्थित होते.
गोमाता ही आपली सर्वाचीच माता आहे, गाईविषयी आपली सर्वाचीच आस्था आहे. याविषयीचे कायदे पूर्वीपासून आहेत.आपणा सर्वाना आस्था असताना देशात वेगळे वातावरण कशासाठी निर्माण करता, असा सवाल करुन शरद पवार म्हणाले,‘देशात सरकार बदलले आहे परंतु देशात विकासाची चर्चा होताना दिसत नाही.आम्ही सर्वसामान्य माणूस, शेतकरी आणि कष्टकरी केंद्रिबदू मानून काम केले.परंतु लोकांना बदल हवा होता. मिळालेल्या सत्तेचा सदुपयोग होताना दिसत नाही.काळा पसा येणार होता परंतु तो कोठे दिसत नाही.तो तर देशातच आहे.’
देशात लावलेली आणीबाणी ही कांॅग्रेसची सर्वात मोठी चूक होती. त्याविरुध्द जयप्रकाश नारायण यांनी बिहारातून सुरुवात केली आणि देशभर आणीबाणी विरुध्द आंदोलन उभे राहिले. महात्मा गांधींनीही चंपारण्यातून इंग्रजांविरुध्द सत्याग्रहाचे आंदोलन सुरु केले. आणि हे बिहारातून सुरु झालेले आंदोलन देशभर पोहोचले. याच पध्दतीने बदलाची वेळ पुन्हा बिहारने देशाला उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणी पूर्वीपासून राहिली. महाराष्ट्रात काळानुरुप कुवत असलेल्या कर्तृत्ववान समाजसुधारकांची फळी उभी राहिली, म्हणून महाराष्ट्राची विचारधारा कायम प्रगल्भ राहिली. बिहार हे गरीब राज्य आहे पण त्याने देशाला नवीन रस्ता दाखवला आहे.’
महाराष्ट्रातील पालिकांच्या स्वच्छतेबाबत राज्य शासनाने काही पालिकांचा गौरव केला. त्यामध्ये वाई पाचगणी महाबळेश्वर या पालिकां आहेत. त्यामागे आमदार मकरंद पाटील यांचे दिशादर्शन आहे. वाई पालिकेची इमारत देखणी व सुंदर झाली आहे. पालिकेची ही प्रशासकीय इमारत विकासाचे केंद्र होईल. शहरांच्या संस्कृतीचा बाज इथे जपला आहे. वाईच्या वैभवात यामुळे भरच पडली आहे. राज्यातील ही एक आदर्श पालिका व्हावी अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. स्वच्छतेच्या राज्यपातळीवरील पालिका म्हणून राज्यशासनाने गौरविल्याबद्दल शरद पवार यांच्या हस्ते नगराध्यक्ष भूषण गायकवाड, मुख्याधिकारी उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव, आशा राऊत, सर्व नगरसेवक-नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी, राज्यात मंत्री होणं आणि मंत्रीपद टिकवणं सोपं, परंतु नगराध्यक्षपद टिकवणं अवघड असल्याचे सांगितले. वाढत्या शहरीकरणामुळे राज्यातील अनेक पालिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी राज्यातील सर्व पालिकांच्या पदाधिकाऱ्यांची बठक महाबळेश्वरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घ्यावी. त्यासाठी पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या पातळीवर प्रलंबित विषयांची माहिती दिली.केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राष्ट्रवादी कांॅग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्षा निलीमा खरात यांनी आभार मानले.
वाई पालिकेच्या साडेसात कोटी खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार.