काँग्रेसचे नेते तथा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज (१७ मे) दुपारी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर मंत्री मुंबईकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, तौते चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावरील सेवा स्थगित करण्यात आल्याने सर्व मंत्रीगण नांदेडमध्ये अडकले. काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार झिशान सिद्दीकी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतलं. दुपारी कळमनुरीत अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सर्वजण मुंबईकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, मुंबईत विमानतळ प्रशासनाने विमानसेवा बंद केल्यानं सर्वजण नांदेडमध्ये अडकले. तौते चक्रीवादळ मुंबईपासून जात आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवनावर त्यांचा परिणाम झाला आहे. रविवारी सायंकाळपासून वादळाची तीव्रता वाढत गेली. सोमवारी चक्रीवादळाने अतिरौद्रावतार धारण केला. त्यामुळे मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे असल्यानं वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे समोरचं दृश्य स्पष्ट दिसत नसल्याने मुंबई विमानतळावरून होणारी हवाई वाहतूक बंद करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नांदेडहून मुंबईत परतण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना बसला आहे.