अलिबाग- अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौते चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ कोकण किनारपट्टीवरून रविवारी गुजरातच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सखल भागातील नागारिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे," असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यांतील ऑक्सिजन प्रकल्पाची विशेष काळजी घेतली जाणार आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेऊन सर्व १५ तालुक्यात आपत्ती निवारण कक्ष २४ तासांसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील ६२ गावे, तर खाडी किनाऱ्यांवरील ११५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज पडल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना ग्रामपंचायती, नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात विशेष खबरदारी.. जिल्हातील सर्व कोविड रुग्णालयात किमान दोन दिवस पुरेल इतका जादा ऑक्सिजनचा साठा करण्यात आला आहे. विज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णालयात किमान दोन जनरेटर तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये महावितरणची यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात कोविड उपचार घेणाऱ्या आणि ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना अलिबाग, माणगाव, पेण, पनवेल येथील रुग्णालयात हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आपत्कालिक परिस्थितीत करोना बाधित रुग्णांना इतर रुग्णालयात स्थलांतरित वेळ आली, तर संभाव्य रुग्णालये आणि तेथील खाटांची उपलब्धता याचे नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. समुद्र किनारे बंद, मासेमारीवर निर्बंध जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे बंद ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मच्छिमारांना मासेमारीसाठी जाण्यास निर्बंध घालण्यात आलेत. बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणला आवश्यक यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्ग वाहतूक सुरळीत रहावी यासाठी महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाला आपत्ती निवारण यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑक्सिजन प्रकल्पांची विशेष काळजी.. रायगड जिल्ह्यात प्राणवायू निर्मितीचे तीन मोठे प्रकल्प आहेत, ज्यातून दररोज ६५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यात केला जातो. वादळाचा या तीन प्रकल्पांना फटका बसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या तीनही प्रकल्पांना आपत्ती निवारण यंत्रणा तैनात असणार आहे. प्रकल्पांचा वीजपुरवठा निरंतर सुरु रहावा यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं ऑक्सिजन निर्मिती करून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकल्पांमधून रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी १० टन ऑक्सिजनचा जादा पुरवठा करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, वादळाच्या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.