नरपड— मांगेलआळीत राजरोस रेती वाहतूक; दगडी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला धोका

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : समूद्र किनाऱ्यावर नरपड मांगेल आळी, चिखला समुद्रकिनारा, डहाणू मागेल आळी, या भागात रेती चोरांनी धुमाकूळ घातला आहे. बेकायदा वाळू उपशामुळे नरपड समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या धूप प्रतिबंध बंधारा धोकादायक बनला आहे.

डहाणू किनाऱ्यावरील  सतीपाडा, दुबळपाडा, धाकटी डहाणू, चिंचणी, दिवा दांडी, डहाणू मांगेलवाडा, नरपड मांगेलवाडा, आगर,  चिखला,  समूद्र किनाऱ्यावर  सायंकाळी ६.३० वा. पासून रेती काढण्यात सुरूवात होते. नरपड मंगेला आळी येथे  समुद्रातून रेती काढण्यासाठी  कोसबाड, झारली  येथील  तरुणांना एक हजार रुपये मजुरी देऊन रात्रभर रेती काढली जाते. डहाणू आगर, मल्याण तसेच केनाड मार्गाने पिकअप वाहनातून  संध्याकाळ ७  पासून सकाळी ७ वाजेपर्यंत  भरधाव वेगाने बेकायदा रेती वाहतूक सुरू असते.   रेती विक्रीतून  चांगले पैसे मिळत असल्याने   स्थानिक तरुण नोकरी,  मच्छीमार व्यवसाय सोडून रेती व्यवसायाकडे वळले आहेत. नरपड येथे समुद्राची  धूप  थांबविणसाठी दगड बांध टाकले आहेत. मात्र नरपड मागेल आळी येथे रात्री पिकअप गाडय़ा मोठय़ा प्रमाणात रेती उपसत आहे. दरम्यान पारनाका येथे पोलीस चौकी असताना हे प्रकार राजरोस सुरू असताना पोलीस आणि महसूल अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

डहाणू किनाऱ्यावरील रेतीची अवैध तस्करी आणि उत्खननामुळे समूद्र किनारे खचण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. डहाणू नजीक  येथील समूद्राच्या वाळू उपशावर लाखोंचा व्यवसाय तेजीत असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात केवळ   वाळू माफियांची दहशत असल्याने स्थानिकांनाही त्यांना रोखण्याची हिंमत होत नाही. रेती वाहतुकीमध्ये यात लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. रेती उत्खनानामुळे सतीपाडा अणि चीखला येथे तर मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत.  सुरुची बाग, बंदर किनाऱ्याची धूप होऊन त्याचा फटका किनार्याला बसत आहे.

नरपड मांगेल आळी, सतीपाडा  येथे राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे किनारे धोकादायक बनले आहेत. त्याविरुद्ध तक्रारी करुनही कारवाई होताना दिसत नाही.

-धनेश आक्रे, स्थानिक रहिवासी

समुद्रावरील वाळू वाहतुकिविरुद्ध खास पथके नेमण्यात आली आहेत. रेतीविरुद्ध वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.

-राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू