प्रल्हाद बोरसे लोकांना काम देण्याबरोबरच भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या उद्देशाने १९७२ च्या दुष्काळात बांधण्यात आलेल्या पाझर तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे डोळेझाक होत असल्याने राज्यातील असंख्य पाझर तलाव धोकादायक झाल्याचे आजचे चित्र आहे. राज्यात १९७२ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी लोकांना काम देण्यासाठी सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गावोगावी पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून टंचाईच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. या तलावांच्या निर्मितीमुळे चांगला पाणीसाठा होऊन त्या त्या परिसरातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली. असंख्य विहिरी जिवंत झाल्याने शेतीलाही हे तलाव चांगले लाभदायक ठरले. मात्र कालांतराने जुन्या झालेल्या, त्यातील अनेक तलावांना गळती लागली. तसेच त्यांच्यात गाळदेखील साचल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा होत नसल्याने त्यांचा हेतू विफल होत आहे. तसेच हे तलाव फुटण्याचाही धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाझर तलावांच्या निर्मितीनंतर इतक्या वर्षांत त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी देण्यात आलेला नसल्याची तक्रार होत आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषद सेस, आमदार निधी किं वा जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या तलावांची दुरुस्ती केली गेली. तसेच जलयुक्त शिवार योजनेत निवड झालेल्या काही गावांमध्येही दुरुस्तीची कामे झाली. परंतु, बहुतांश पाझर तलावांच्या दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष नसल्याची तक्रार केली जात आहे. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील पाझर तलाव फुटल्यानंतर देखभाल, दुरुस्तीअभावी धोकादायक बनलेल्या या जुन्या पाझर तलावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ४६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पाझर तलाव अतिवृष्टीमुळे नुकताच फुटल्याने शेतांमध्ये शिरलेल्या पूरपाण्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. जवळपास पावणेदोनशे जनावरे पाण्यात वाहून गेली. तलावाखालील जमीन वाहून गेल्याने अनेकांची शेती नापिकी बनली. तलाव फुटण्याची ही दुर्घटना सायंकाळच्या सुमारास झाल्याने शेतवस्तीत वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना सुदैवाने सुरक्षितस्थळी निघून जाणे शक्य झाले. परंतु जर ही दुर्घटना रात्री झाली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता होती. वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी पूर्ण केलेली विकास कामे देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या ताब्यात दिली जातात. या न्यायाने हे पाझर तलावदेखील ग्रामपंचायतींकडे सुपूूर्द करण्यात आले आहेत. परंतु, उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतामुळे राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे पैशांची सतत चणचण असते. त्यामुळे या ग्रामपंचायती स्वनिधीतून पाझर तलाव दुरुस्तीची कामे करू शकत नाही. अशा वेळी वेगळ्या शासकीय यंत्रणांकडे आर्जव करून ही कामे होण्यासाठी ग्रामपंचायती धडपड करीत असतात. परंतु, त्यात यश येत नाही. तसेच संबंधित यंत्रणा त्याची एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची प्रचीती येत असल्याने असंख्य पाझर तलाव सद्य:स्थितीत नादुरुस्त तसेच धोकादायक अवस्थेत पडून आहेत. या पाझर तलावांच्या देखभाल दुरुस्तीची कामे सक्षमपणे करता यावीत म्हणून २०११ मध्ये शासनाने गाव पातळीवर पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले होते. परंतु, अंमलबजावणीच्या पातळीवर हा आदेश बासनात गुंडाळला गेल्यामुळे पाझर तलाव दुरुस्तीचे हे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. वळवाडे येथील पाझर तलाव धोकादायक बनल्याने तो कोणत्याही क्षणी फुटू शकतो अशी भीती असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी १० वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता. परंतु, शासकीय यंत्रणांनी प्रतिसाद दिला नाही. यंत्रणांची बेफिकीर वृत्तीच हा तलाव फुटण्यास कारणीभूत ठरली. या तलावापासून काही अंतरावरील दुसरा एक तलाव फुटण्याची शक्यता आहे. - जितेंद्र राऊत, कार्याध्यक्ष, मालेगाव कांदा उत्पादक संघ