भादोला येथील अवैध दारुविक्री, जुगार बंद करण्यासाठी सोमवार, १६ फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर चंदन यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करतांना चंदन यांनी सात दिवसात भादोल्यातील दारू विक्री आणि मटका बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दारूचे दुकान सुरू करू, असा इशारा दिला. या मोर्चानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर ठाणेदारांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निर्मल ठेंग, महेंद्र जाधव, गंगाधर तायडे, इम्रान व भादोला येथील महिला उषा ठेंग, बाली गवई, गीताबाई ठेंग, दुर्गाबाई मिसाळ, जिजाबाई डुकरे यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.