वाडा: वाडा तालुक्यातील गुंज (बुधावली) येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या प्रमिला शांताराम पागी (१४) या विद्यार्थिनीचा मृत्यू कुपोषणाने झाला नसून तो अन्य आजाराने झाला आहे, असे स्पष्टीकरण गुरुवारी राज्य शासनाने दिले. आजारी असल्याने प्रमिलाला १ ऑगस्ट रोजी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची परिस्थिती खालावल्याने तिला ठाण्यात शासकीय रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ठाण्याला नेले जात असतानाच तिचा मृत्यू झाला. गुंज आश्रमशाळेत प्रवेश घेण्यापूर्वी प्रमिला शहापूर तालुक्यातील पिळंजे आश्रमशाळेत शिकत होती. त्यानंतर तिने गुंज आश्रमशाळेत प्रवेश घेतला. तिच्या आरोग्याची कसलीही तक्रार नसल्याने तिच्या नियमित वैद्यकीय तपासणीमध्ये आढळून आले आहे. जुलै महिन्यात तीन वेळा आणि ऑगस्टमध्ये चार वेळा आरोग्यसेविकेने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली होती. त्या वेळीही तिला कोणताही आजार असल्याचे किंवा ती कुपोषित असल्याचे आढळले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू कुपोषणाने झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.