बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भनगोजी येथे शेतकरी महिलेने नापिकी आणि कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेतात स्वत: सरण रचून महिलेने आत्महत्या केली असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. आशा इंगळे असे या महिलेचे नाव असून त्या माजी सरपंचदेखील होत्या, असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोत्रा भनगोजी गावात राहणाऱ्या आशा इंगळे यांच्याकडे साडे तीन एकर जमीन आहे. मात्र, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्या आर्थिक विवंचनेत होत्या. आशा यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले असून एका मुलीचे लग्न झाले आहे. तर त्यांची दोन्ही मुले रोजंदारीवर काम करतात. आशा इंगळे यांच्यावर एकूण ८० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. दुष्काळामुळे यंदा आणखी परिस्थिती आणखी बिकट येणार, असे त्यांना वाटत होते. यातूनच बुधवारी रात्री आशा इंगळे यांनी शेतातील गोठ्यात स्वत: सरण रचून आत्महत्या केली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना

बुधवारी कर्जबाजारीपणातून सांगलीत शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली होती. गणेश प्रकाश पाटील (वय ३४) आणि लीलावती पाटील (वय ३१) असे या दाम्पत्याचे नाव होते. तर परभणी येथेही सततच्या नापिकीमुळे एका शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना मंगळवारी घडली होती. वालूर येथील शेतकरी मोहम्मद रशीद अन्सारी (वय ६८) यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. नापिकी व खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते.

धुळे तालुक्यातील नावरा येथील नबाबाई पाटील (५५) हिने नापिकी, दुष्काळ आणि कर्ज याला कंटाळून नऊ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात स्वत:ला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. तसेच शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथील संभाजी पाटील (३०) या शेतकऱ्यानेही कर्जाला कंटाळून सोमवारी सायंकाळी शेतातील झाडाला गळफास घेतला. तर सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debt ridden drought woman farmer commit suicide in buldhana
First published on: 16-11-2018 at 09:06 IST