पश्चिम घाट परिसरातील विकासकामांबाबत कस्तुरीरंगन समितीने आपला अहवाल दिला असला तरीही याप्रकरणी निर्णय घेण्यात कोणतीही घिसाडघाई केली जाणार नाही. या परिसरातील संबंधितांना पूर्ण विचारात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून मगच या विषयी योग्य तो निर्णय शासनातर्फे घेतला जाईल, अशी हमी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
आमची विकास प्रक्रियेविषयी ठाम भूमिका आहे. विकासाचे आम्हाला वावडे नाही पण हा विकास पर्यावरणाची किंमत मोजून होत असेल तर ते आम्हाला परवडणारे नाही, अशा शब्दांत पर्यावरणमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. म्हणून पश्चिम घाटाशी संबंधित सातही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच या परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा करू आणि मगच या अहवालाची अंमलबजावणी करायची किंवा कसे ते ठरवू, असेही जावडेकर यांनी सांगितले.