वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील सेवाग्रामच्या कस्तुरबा रूग्णालयात १०० बेड वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने आज (शनिवार) घेतला. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी रूग्णालयाचे डॉ. नितीन गगणे यांना याबाबत सूचना केली आहे. प्राप्त माहितीनूसार, रूग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज दूपारी एक तातडीची बैठक घेतली. त्यात सेवाग्राम व सावंगी रूग्णालयाचे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. ग्रामीण भागातील रूग्णसंख्येतवाढ होत आहे. त्यामूळे आता गंभीर रूग्णांनाच रूग्णालयात दाखल केले जाणार असून सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल. तसेच, स्वखर्चाने हॉटेलमध्ये राहण्याची सुविधादेखील प्रशासनाने मान्य केली आहे. सेवाग्रामच्या कस्तुरबा रूग्णालयात २०० बेड आहेत. त्यात आणखी १०० बेड वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी रूग्णालयाचे डॉ. नितीन गगणे यांना केली. सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात ३५० बेड असून, आणखी २५० खाटा वाढविण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले. सरसकट सर्वच बाधितांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असल्याचा सूर उमटत होता. या पार्श्वभूमीवर काही बदल करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. रूग्णांच्या प्रकृतीबाबत नातलग मंडळी अनभिज्ञ असतात. त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होते. मात्र, खरी माहिती त्यांना मिळत नाही. याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सावंगी व सेवाग्रामच्या रूग्णालयात हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. विलगीकरण केंद्रात राहण्यास अनेक बाधित ईच्छूक नसतात. स्वखर्चाने हॉटेलमध्ये राहायची त्यांची तयारी असूनही त्यांना ही सवलत नाकारल्या जात असल्याच्या तक्रारीवर बोलतांना, याबाबत माहिती घेऊन निराकरण केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.