पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२० आणि २१ हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे. ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण हे वर्ष सुरु केलं आहे. प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मार्च २०२० पासून कोविड १९ या करोना विषाणूचा प्रादुर्भाव जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामधली सगळी शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी साधारणतः जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. २०-२१ या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र त्यांचं स्वरुप ऑनलाइन, टीव्हीच्या माध्यमातून होतं. मात्र मुलांवर, विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.