कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण अलिबाग : नद्या या आपली संस्कृती आणि इतिहास आहे. या नद्यांचे संवर्धन व्हायला हवे, त्या प्रदूषणविरहित राहिल्या हव्यात. कुंडलिका नदी संवर्धनाच्या माध्यमातून हेच काम होत आहे. त्यामुळे या कामाचे कौतुक व्हायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. ते रोहा येथे कुंडलिका संवर्धन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उपस्थित होते. नद्या या संजीवनी असतात, समाजाची संस्कृती नद्यांच्या काठावर वाढत असते. त्या इतिहास तयार करत असतात. त्यामुळे समाजात नद्यांना आदराचे स्थान असते. पण कधी कधी आम्ही नद्या प्रदूषित करण्याचे काम करत असतो. या नद्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून नेमके तेच होत असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. कोकणातील औद्योगिकीकरणाचे पवार यांनी यावेळी समर्थन केले. कोकणचा विकास हा औद्योगिक, पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्योत्पादनातून व्हायला हवा. जेएनपीटी बंदरामुळे रायगडचा कायापालट झाला. आता दिघी आणि पालघरमधील वाढवण येथे तशीच बंदरे विकसित होत आहेत. त्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वाास पवार यांनी व्यक्त केला. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प रोहा येथे कुंडलिका नदी किनाऱ्यावर पावणे सहा एकर परिसरात ४० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला. यात उद्याने तसेच इतर सुविधा आहेत. ‘करोनाबाबत सतर्कता हवी’ करोना विषाणूच्या संकटातून आपण वाचलो असे वाटत होते, मात्र राज्यभरात करोनाचा आलेख पुन्हा उंचवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. १० पैकी सात लोक आज मास्कचा वापर करत नाहीत. लोकांनी सरकारने सांगितलेले ऐकले पाहिजे, सामूहिक शक्ती आणि शिस्तीच्या जोरावर आपण करोनावर मात करू. बाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. पण पुढचे दोन महिने खबरदारी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले.