दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं असून केजरीवाल यांनी ‘जन की बात’ देशाला दाखवून दिली असं म्हटलं आहे. तसंच आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला असल्याची अप्रत्यक्ष टीका भाजपावर केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
“दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन. दिल्लीतील जनतेने ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार हे दाखवून दिलं आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना केली. स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल यांचा ते पराभव करू शकले नाहीत. दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि जनतेने लोकशाहीवरचा विश्वास कायम असल्याचे दाखवले”.

“आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोड़ला. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो,” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.