दिल्लीत शुक्रवारी निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात सामील होण्यासाठी गेलेल्या कोल्हापूरमधील शेतकऱ्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. करण संत (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दिल्लीत शुक्रवारी देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले करण संत (वय ४५) हे देखील मोर्चासाठी दिल्लीत गेले होते. शनिवारी सकाळी पहाडगंज येथील आंबेडकर भवनातील तिसऱ्या मजल्यावरुन पडून करण संत यांचा मृत्यू झाला. करण संत हे तिसऱ्या मजल्यावरुन खाली कसे पडले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, संसद मार्गावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मोर्चानिमित्ताने सर्व विरोधकांनी ‘किसान मुक्ती मोर्चा’च्या व्यासपीठावर एकत्र येत मोदींविरोधात हल्लाबोल केला. मागण्या मान्य करा किंवा सत्ता सोडा, असा घोष करीत हजारो शेतकरी दिल्लीत धडकले होते.२१० शेतकरी संघटनांच्या ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’च्या सभेला राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल आदी नेते उपस्थित होते.