पेणच्या गणेशमुर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून शिथीलता देण्याची मागणी केली जात आहे. टाळेबंदीमुळे गणेशमुर्ती बनविण्याचे काम बंद आहे. त्यामुळे गणेशमुर्तीकारांचे नुकसान होत आहे.

पेण तालुक्यात गणेश मुर्ती बनवणाऱ्या पाचशे कार्यशाळा आहेत. यात जवळपास १० हजार लोक काम करतात. दरवर्षी शहरात २० ते २५ लाख गणेश मुर्तीं तयार केल्या जातात. ज्या देशाविदेशात पाठविल्या जातात. मात्र टाळेबंदीमुळे सध्या गणेश मुर्ती बनविण्याचे काम बंद आहे. यामुळे मुर्तीकार, कार्यशाळा चालक आणि कामगारांचे मोठ आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन टाळेबंदीतून पेणच्या गणेश मुर्ती व्यवसायाला सूट दिली जावी अशी मागणी केली जात आहे.

टाळेबंदीमुळे राज्याची विस्कळीत झालेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर यावी यासाठी शासनाने करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणच्या उद्योगांना पुन्हा चालना देण्याचे धोरण स्विकारले आहे. टाळेबंदी लागू झाल्यापासून पेण तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे पेण मधील गणेश मुर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट द्यावी अशी मागणी मुर्तीकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

मार्च ते जून महिन्यात गणेश मुर्ती बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यांनंतर तयार झालेल्या गणेश मुर्तींचे रंगकाम सुरु होते. मात्र कार्यशाळा बंद असल्याचे मुर्ती बनविण्याचे काम सध्या पुर्ण ठप्प झाले आहे. यामुळे मुर्तीकारांचे गणेश मुर्ती बनविण्याचे नियोजनही कोलमडले आहे.

पेण तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे शासनाने काही अटी आणि शर्ती घालून पेणच्या गणेश मुर्तीकारांना टाळेबंदीतून सूट द्यावी. नियमांचे पालन करून घरोघरी गणेश मुर्ती तयार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार   रविंद्र पाटील यांनी केली आहे.

पेण येथील गणेश मुर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून शिथीलता द्यावी अशी मागणी केली जात असली तरी शासनाच्या निर्देशानुसार तुर्तास तरी गणेश मुर्तीकारांना दिलासा देता येणार नाही, उद्योगांना दिलेली शिथीलता  मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रासाठी लागू नाही. असे जिल्हाधिकारी  निधी चौधरी म्हणाल्या आहेत.