वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी आमदार वारीस पठाण यांच्या विरोधात शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. वारीस सारख्या धर्मांधाना धडा शिकवण्यास शिवसैनिक पुरेसे आहेत, असा इशारा देण्यात आला. ओवेसी बंधूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली.

एमआयएमचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि माजी आमदार वारीस पठाण याने हिंदू धर्मियाबद्द्ल आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचा शिवसेना कोल्हापूर शहर कार्यकारणीच्या वतीने निषेध करण्यात आला. ओवेसी बंधू आणि त्यांच्या बगलबच्य्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा नेते ऋतूराज क्षीरसागर यांनी केली.

पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा झाले. यावेळी ‘ओवेसी बंधू हाय हाय’ अशा निषेध करणाऱ्या घोषणांनी देण्यात आल्या.यावेळी महिला आघाडी शहरसंघटक .मंगल साळोखे, पूजा कामते, मंगल कुलकर्णी, शाहीन काझी, मीनाताई पोतदार, दीपक गौड, अरुण सावंत, रमेश खाडे, तुकाराम साळोखे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.