राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बोलण्याची शैली सगळ्यांना माहितीच आहे. तापट स्वभावाचे अजित पवार मनात आलेलं पटकन बोलून जातात. याची प्रचिती बारामतीकरांनी पुन्हा एकदा घेतली. निमित्त होत अजित पवार यांच्या नागरी सत्काराचं. गावाकडून मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करताना अजित पवारांनी जागेची अडचण बोलून दाखवली. इतकंच नाही, तर त्यामुळेच सूनेत्रा तिथून निघून आली. हे सांगताच गर्दीतून हास्याचे कारंजे उडाले. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये अजित पवार यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार यांनी बारामतीसह राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्याचबरोबर मुंबईत भेटीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना एक आवाहनही करायला अजित पवार विसरले नाही. पण, हे आवाहन ऐकून कार्यकर्ते मात्र, खळखळून हसले. काय म्हणाले अजित पवार? "मुंबईला येत असताना जी मुंबईची कामं असतील तिच घेऊन या. बरेच जण विचारल्यावर सांगतात, काही नाही दादा सहज भेटायला आलो, म्हणतात. सहज देखील भेटायला येऊ नका. एकतर अजून सरकारी घर मिळायचं असतं, ते मिळालेलं नाही. त्याच्यामुळे ज्या घरात राहतोय, तिथे डायनिंग टेबलवर माणस बसवावी लागतात. हॉलमध्ये बसवावी लागतात. बेडरूममध्ये माणसांना बसवावं लागतं. सूनेत्रा तर तिथून निघूनच आली. म्हणाली, आता राहतच नाही इथे. जोपर्यंत मोठं घर मिळत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला समजून उमजून घ्या."