देशात आणि जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आलं. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करण्यात आलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मत व्यक्त केलं. ज्यांना बाबा रामदेव यांच्या औषधावर विश्वास आहे त्यांनीच ते औषध घ्यावं, असं ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“बाजारात अनेकजण करोनावर औषध आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदेव बाबा यांनी करोनावर औषध आणलं आहे. ज्यांचा त्यांच्या औषधांवर विश्वास आहे त्यांनी ते घ्यावं,” असं अजित पवार यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघतं, कुरबुरी काढतं…”; चीनसंदर्भात प्रश्नाला अजित पवारांचे उत्तर

दरम्यान, यापूर्वी आज दुपारी बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत करोनावरील औषध लाँच करण्यात आलं. “संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीं आम्ही करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असं मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केलं. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- मोठी बातमी : पतंजलीचं करोनावरी आयुर्वेदिक औषध लाँच

सध्या जगभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत करोनावरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.