पवनार परंधाम आश्रम परिसराच्या सौदर्यीकरणाची बाब गांधीवादी व शासनातील संघर्षांचे कारण ठरत असल्याची चिन्हे आहे. या परिसरात पर्यटन क्षेत्र उभारल्याल पवनारचे पावित्र्य कमी होईल, असा गांधीवाद्यांचा मुख्य आक्षेप आहे. सेवाग्राम विकास आराखडा शासनाने मंजूर केला असून त्यात ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या वास्तूंचा विकास करतांना सेवाग्राम-पवनार-वर्धा अशा त्रिमितीतून नवा आराखडा तयार झाला. सेवाग्राम आश्रमातील कामांचे मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनही केले आहे. मात्र पवनार विकास आराखडा वादाचा ठरू लागताच शासनाने आखडती भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.धाम नदीकाठच्या परंधाम आश्रम हा पर्यटनस्थळ परिसर म्हणून विकसित करण्याची शासनाची भूमिका आहे. ४० कोटी रूपये खर्चून प्रथम टप्प्यात काही कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी परंधाम आश्रम व महामार्गालगतच्या जागेची निवड झाली आहे. विनोबा समाधी, गांधी रक्षा केंद्र, परंधाम आश्रम, केंद्रस्थानी राहणार आहे. हा नदीच्या उत्तरेचा भाग व दक्षिणेकडील मंदिराचा परिसर असा नदीच्या दोन्ही तीराकाठी सौदर्यीकरणाचा प्रस्ताव आहे. सध्या परिसरात गांधीप्रेमी व भाविक मंडळीचा राबता आहे. पण नव्या सोयी निर्माण झालेल्या नाही. वाहने ठेवण्याचा गोंधळ, नदीपरिसरात कचरा, अतिक्रमण, उठाठेवी पर्यटकांचा गोंधळ, जमिनीची धूप, नदीतील पाण्याचे प्रदूषण व अन्य बाबी या ऐतिहासिक परिसरास विद्रूप करणाऱ्या ठरतात. याच बाबी दूर करण्यावर कटाक्ष ठेवून आराखडा तयार झाला. प्रस्तावित आराखडय़ात हा सार्वजनिक परिसर पर्यावरणपूरक करतांनाच गांधी-विनोबांच्या विचारांना प्रतिबिंबित करणारा ठरेल, असे ठळकपणे नमूद आहे. परिसर प्रदूषणमूक्त करणे, नदीकाठ आल्हाददायी करणे, पूरनियंत्रक रेषेची स्थितीपाहून नदीकाठ उंचावणे, प्रदूषित पाण्याचे शुध्दीकरण, धार्मिक विधी व नदीत होणाऱ्या अन्य कामांचे जागापालट, असे काम होणार आहे. नदीकाठी हरितपट्टा तयार करतांना बारमाही हिरवेगार राहणाऱ्या झाडांची लागवड केल्या जाईल. या पट्टय़ालगत योगा व तत्सम उपक्रमांसाठी जागा राखीव ठेवण्याचे सूतोवाच आहे. हा संपूर्ण परिसर एका मुख्य प्रवेशद्वाराशी जोडला जाईल. पर्यटकांची सुरक्षा तसेच परिसरावर निगराणी ठेवण्यासाठी ‘एन्ट्रंस प्लाझा’ तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. परिसरात ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महामार्गापलिकडेच सर्व वाहने ठेवण्याची व्यवस्था राहील. विविधरंगी कारंजी, स्वयंचलित पाणीपुरवठा, स्प्रिंकलर, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे व अन्य सोयी प्रस्तावित आहेत. बंगलोरच्या ‘एन्व्हायरो डिझायनर’ कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. हे स्थळ पर्यावरणपूरक हिरवेगार करतांनाच पर्यटनस्नेही तसेच नदीचे पावित्र्य जपणारे व गांधी-विनोबांच्या विचारांचा आदर्श मांडणारे राहील, असा दावा कंपनीने केला. गांधीवाद्यांचा मुख्य आक्षेप हे केवळ पर्यटनस्थळच आहे कां, असा गांधीवादांचा मुख्य आक्षेप आहे. या परिसरात गांधी रक्षाकेंद्र व विनोबाजींची समाधी आहे. मुख्यत्वे म्हणजे नदीकाठी असणाऱ्या परंधाम आश्रमची चिंता आहे. आश्रमात महिलाच असतात. विविधढंगी पर्यटकांमूळे महिलांच्या सुरक्षेची बाब नेहमीसाठी डोकेदुखी ठरणार. ऐतिहासिक स्थळाचे पर्यटनस्थळ झाले म्हणजे मनोरंजनाच्याच बाबी अग्रक्रमावर येतात. त्या बाबी आल्या म्हणजे वास्तूंचे पावित्र्य कोणाच्याही खिजगणतीत नसते. वाहने, वाद्ये, धांगडधिंगा रोखणे शक्य होत नसल्याचे देशातील काही पर्यटनस्थळाची स्थिती पाहून लक्षात येते. दक्षिणेकडचा नदीकाठ सुरक्षित करण्यासाठी भराव टाकण्याचे प्रस्तावात नमूद आहे. ही बाब नदीकाठच्या गावकरी व शेतीसाठी धोक्याचे ठरणार आहे. पाण्याचा प्रवाह वळवतांना काही वास्तूंवर भविष्यात संकट उद्भवेल, अशी भीती गांधीवादी व्यक्त करतात. औपचारिक चर्चेत ही बाब दिसून आली. पण ठोसपणे विरोध व्यक्त करण्याचे गांधीवादी टाळतात. मात्र हे आक्षेप शासनकानी गेल्यावर तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली. आराखडा तयार करणाऱ्या कंपनीचा अधिकारी आमची भेट घेणार आहे. त्यांची भूमिका ते मांडतील. या आठवडय़ात ही चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतरच मी अधिकृत भाष्य करू शकेल. आक्षेप काय, याविषयी मी बोलणार नाही. ते पूढे पाहू. - गौतमभाई बजाज, परंधाम आश्रमचे विश्वस्त