माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला पहाटे शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला होता. त्या पहाटेच्या शपथविधीला तीन दिवसांपूर्वी वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे या घटनेबद्दल विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आपापली मतं व्यक्त केली. तशातच, लेखिका प्रियम गांधी-मोदी यांनी आपल्या ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात पहाटेच्या शपथविधीच्या आधीची गोष्ट लिहीली असल्याने हे पुस्तकही सध्या चांगलंत गाजतंय. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका नेत्याने शरद पवारांचा त्या पहाटेच्या शपथविधीशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. “उद्धवजी, सुडाचा बदला सुडाने घेण्यापेक्षा…”; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका 'पॉवर ट्रेडिंग' या पुस्तकात सत्तास्थापनेसाठी शरद पवार हे भाजपाशी हातमिळवणी करण्यास तयार होते असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये पहाटेच्या शपथविधीच्या आधी घडलेला सगळा वृत्तांत सांगितला आहे. त्यावेळी शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या सोबत येण्याचे मान्य केले होते. पण नंतर गोष्टी बदलल्या. शरद पवार यांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची आहे. काळाच्या ओघात सर्व घटना उघड होतील!" दरम्यान, या शपथविधीच्या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मत व्यक्त केलं होतं. "आता यापुढे पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही. जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल, तेव्हा पहाटेची वेळ नसेल. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळेल. तसेच त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचं कामही सुरू आहे. पण असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.