केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेसाठी धोरणात्मक धोरणात्मक व क्रांतिकारक निर्णयांचा सपाटा लावला असून. राज्यातही आम्ही मोदींच्या पावलावर पाऊल टाकत विकासपर्व सुरू केले आहे. यात जनतेने भाजपला साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वणी आणि यवतमाळच्या जाहीरसभांमध्ये केले.वणी नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार तारेंद्र बोडे आणि यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा कोठेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीरसभांमध्ये बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांवर ताशेरे ओढले. विरोधकांच्या कचखावू वृत्तीमुळे शहराच्या विकासाचे वाटोळे झाले असून भाजपकडेच विकासाची दृष्टी आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. वणीत विधानसभेत भाजपच्या संजीवरेड्डी बोदकुलवार, यवतमाळात मदन येरावार यांच्यासह जिल्ह्य़ात भाजपचे पाच आमदार जनतेने निवडून आले आहेत. आता शहराचा विकास करण्यासाठी जिल्ह्य़ातील आठही नगराध्यक्ष हे भाजपचेच निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले. मोदींनी नोटाबंदी करून काळाबाजारी आणि देशविघातक शक्तीचे कंबरडे मोडले. भ्रष्ट्राचार रोखण्याच्या व दहशतवाद संपवून देशांला विकासाकडे नेऊन गरिबांचे कल्याण करण्याच्या मोदींच्या धोरणांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष विरोध करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. स्कील इंडिया, मेक इन इंडिया अशा योजनांच्या माध्यमांमधून रोजगाराला प्रोत्साहन दिले. मागील काळात गावाकडील लोक शहरात आले, परंतु मागील सरकारच्या निष्क्रीय धोरणामुळे शहराचा विकास झाला नाही. मात्र, आता भाजप सरकार शहराच्या विकासावर लक्ष देणार असल्याने विकासासाठी भाजपाला मते द्या, संधी द्या. आम्ही वणीचा कायापालट करू, असे आवाहन त्यांनी केले. घाणपाणी व कचरा यावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवा. तो आम्ही मंजूर करून केंद्रात पाठवू, असे आश्वासन दिले. यावेळी तारेंद्र बोर्डे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, राजु तोडसाम, अशोक उईके, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तारेंद्र बोर्डे रेखा कोठेकर आदी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.