मोगलांना, इंग्रजांना जे जमलं नाही, ते या ठाकरे सरकारने करुन दाखवलं अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. बंडातात्या कराडकर यांना सरकारने अटक केल्याप्रकरणी त्यांनी ही टीका केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या गोंधळ सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारली. राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.

हेही वाचा- धान्य घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा – देवेंद्र फडणवीसांची मागणी

“वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे! तीव्र निषेध!” अशा शब्दांमध्ये ट्विट करत, देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती.