काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद दिसू लागल्याचं सांगितलं जात असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसतंय. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहातो आहे’, असं फडणवीस म्हणाले.

‘राज्यपाल तारीख ठरवतात’

‘सरकारकडे प्रचंड बहुमत असताना सरकार घाबरत का आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पहातो आहे. हे घाबरट सरकार आहे. नियमावलीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल आधी तारीख ठरवून पाठवतात. ती निवडणूक सिक्रेट बॅलटने होते. पण गेल्या काही दिवसांमधल्या चर्चा पाहिल्या, तर हे सरकार आपल्याच आमदारांना घबरत असल्याचं दिसतंय. आपला उमेदवार पडतोय की काय, याचीच सरकारला जास्त भिती आहे. पण चांगलं आहे. यामुळे आमचं मनोरंजन होतंय आणि आमदारांचं भलं होतंय’, असं फडणवीस म्हणाले.

‘तो नाना पटोलेंचा पब्लिसिटी स्टंट’

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्वीटवरून नाना पटोलेंनी सिनेमाचं शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. ”नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितीये की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोललं, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचंच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचं नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसं आणि कोण बंद करू शकतं? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.