राज्यातील साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही,” असा टोला लगावत फडणवीसांनी भेटीमागील कारण सांगितलं.

भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले,”त्या मुलाखतीमध्ये विद्वान संपादक. आमचं पटत नसलं, तरी ते विद्वान आहेत हे मी मानतो. ते राज्य सभेचे सदस्यही आहेत. ते मुख्यमंत्र्यांना विचारतात की, मी साखर उद्योगाचे प्रश्न घेऊन अमित शाह यांना कशासाठी भेटलो. आता यांना इतकंही माहिती नाही की, साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला, त्याचे अध्यक्ष अमित शाह हे आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. शरद पवार यांनी सुद्धा साखर उद्योगासंबंधात पत्र लिहिली आहेत, ती काही आदेश बांदेकरांना नाही लिहिलेली. ती त्यांनी अमित शाह यांनाच लिहिली आहेत. आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल, तर शेतकऱ्यांचे काय होणार,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

आणखी वाचा- “रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, मात्र कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”

आणखी वाचा- महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी तयारीला लागा, केंद्रातून आदेश

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखती राऊत यांनी देवेद्रे फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यासंबंधी प्रश्न केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना “त्यांना गृहमंत्री आदेश बांदेकर कार्यक्रम करतात, तसे वाटले असतील होम मिनिस्टर,” असं म्हटलं होतं.