महाविकास आघाडी सरकार हे पलटूराम सरकार आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा उमेदवार संदीप जोशी यांचा प्रचार करण्यासाठी पदवीधर मेळाव्यात बोलत होते. उर्जा मंत्र्यांनी स्वतः घोषणा करत वाढीव वीज बिलं कमी करु असे जाहीर केले होते. तिन्ही पक्षांचे कॅबिनेट मीडियासमोर आले त्यांनी वाढीव वीज बिलं कमी करु अशी घोषणा करत फोटोही काढून घेतले. आता मात्र सगळ्यांनी पलटी मारली अशीही टीका फडणवीस यांनी केली.

आता उर्जा मंत्री म्हणत आहेत की माझा अभ्यास नव्हता, महावितरणची ५९ हजार कोटींची थकबाकी आहे हे मला माहित नव्हते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वर्षभरात विदर्भात फिरकले नाहीत. हे विदर्भ, मराठवाड्यासाठी, उत्तर महाराष्ट्र, कोकण यासाठी काम करणारे सरकार नाही. मुख्यमंत्री एका भागासाठी काम करतात आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या भागासाठी काम करतात. पण महाराष्ट्रात काम कोण करणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या पदवीधर मेळाव्यात विचारला.

“या सरकारमध्ये कोणताही मंत्री उठतो आणि घोषणा करुन मोकळा होतो. जनतेची कामं मात्र कधीही होत नाहीत. नुसत्या बदल्यांचे प्रकार चालवले आहेत. या सरकारमध्ये दलाल सक्रिय झाले आहेत असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.