नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार सुडाचं राजकारण करत असल्यचा आरोपही फडणवीस यांनी केला असून, “तुकाराम मुंढे काय कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही,” अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केल्यापासून नागपुरात आयुक्त विरुद्ध भाजपा असं वाद निर्माण झाला होता. अनेक वेळा हा वाद चव्हाट्यावरही आला. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं. दरम्यान, अचानक तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. मुंढे यांच्या बदलीविषयी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा- करोना काळ असला तरीही बिहार पुन्हा जिंकणारच, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

देवेंद्र फडणवीस म्हणाले,”मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली जरी असेल, तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. याचं कारण म्हणजे माझी दोन नंबरची कामं नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करत आहे,” असा आरोप फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

आणखी वाचा- राज्यात कृषी विधेयक मंजूर करणार नाही : अजित पवार

“शेतकरी विधेयकांची अमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. हे निव्वळ राजकारण आहे. हे इतके दुटप्पी आहेत की,काँग्रेसनं निवडणूक जाहीरनाम्यात ‘आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू’ असं म्हटलं होतं. जर सत्तेत आलो नाही, तर हे करू देणार नाही, असंही म्हणायला हवं होतं. आता शेतकरी उत्तर देतील. त्यांना अमलबजावणी करावी लागेल,” अशी टीका फडणवीस यांनी केली.