लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच धनंजय मुंडेंचा आरोप

बीड : लोकसभा निवडणुकीमध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मूळ झालेल्या मतदानापेक्षा अधिकचे मतदान मोजण्यात आले आहे. बीड मतदारसंघातही सहाशे मतांचा फरक असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केला. याबाबतची सर्व कागदपत्रे निवडणूक विभागाकडून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत याचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे, त्यामुळे पुरावे हाती आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत मदत म्हणून बारामतीच्या अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने पाणीपुरवठय़ासाठी पाठवलेल्या २१ टँकरचे गुरुवारी धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी पत्रकार बठकीत धनंजय मुंडे म्हणाले,की ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी आणि त्यांना शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने टँकर सुरू करण्यात आले आहेत. २१ टँकरच्या माध्यमातून आठ लाख लिटर पाणी जनतेला पुरवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पाण्याची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रशासन स्तरावर टंचाईचा सामना होऊ शकत नाही. म्हणूनच जिथे प्रशासन पाणी देऊ शकत नाही तिथे आम्ही पाणी पोहोचवणार आहोत. आता पावसाळ्यापर्यंत हे टँकर सुरू राहतील. जिल्ह्याच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनतेला प्रथमच ही मोठी मदत मिळाल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा निकालासंदर्भात ते म्हणाले,की बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मूळ झालेल्या मतदानापेक्षा अधिकचे मतदान मोजले गेल्याचे प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात निवडणूक विभागाकडून सर्व कागदपत्रे प्राप्त होताच पक्षाध्यक्ष शरद पवार  यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले,की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला होता. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी बीड परिसरातील शेतकऱ्यांनी पिण्यायोग्य पाणी टँकरमधून मिळत नसल्याची तक्रार पवारांकडे केली होती, तेव्हा पवार यांनी या परिसरासाठी ३० ते ४० टँकर सुरू करू, असा शब्द दिला होता. त्या अनुषंगाने अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने पहिल्या टप्प्यात २१ टँकर पाठवून पवारांनी शब्द पाळल्याचे त्यांनी सांगितले. आणखी ४० टँकर पाठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. या वेळी माजी आमदार उषा दराडे, सुनील धांडे, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.