विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्यांवरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये या अनिष्ट राजकारण करणाऱ्या शक्तीचा नाश मतदानरुपी होळीत करूयात असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. तसंच नरेंद्र मोदी चेतन भगत यांच्यापेक्षा ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ पुस्तकाची चांगली आवृत्ती लिहू शकतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

‘गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच पुरुष कामगारांची संख्या इतक्या मोठ्या संख्येने घटली आहे. बेकारीत खितपत न पडता यांच्या २ कोटी रोजगारांच्या आश्वासनांची आज होळी करून टाकूयात. आगामी निवडणुकांमध्ये या अनिष्ट राजकारण करणाऱ्या शक्तीचा नाश मतदानरुपी होळीत करूयात’, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला असून 2014 नंतर पुरुष कामगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे सांगण्यात आलं आहे. 2017-18 मध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने केलेल्या सर्वेक्षणात 1993-94 नंतर 2017-18 मध्ये पुरुष कामगारांच्या संख्येत 28.6 कोटींची घट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 1993-94 मध्ये हा आकडा 21.9 कोटी होता. तर 2011-12 मध्ये 30.4 कोटी होता.

पुढील ट्विटमध्येही धनंजय मुंडे यांनी ‘गेल्या दोन वर्षात 80,000 बालके कुपोषणाने दगावली आणि याच विभागाचे पोषण आहाराचे 6300 कोटीचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचारामुळे रद्द केले आहे… चौकीदार झोपला आहे का? की यात चौकीदार भी भागीदार है? जीवन इतके स्वस्त झाले आहे का? सरकारला लाज वाटत नाही का?’, असे सवाल विचारले आहेत.

धनंजय मुंडे यांनी अजून एक ट्विट केलं असून यामधून नरेंद्र मोदींना टोला मारला आहे. नोटाबंदी, खोट्या जाहिराती दाखवून लोकांची फसवणूक, तरीही 2019 लोकसभा निवडणूक लढवणे हे तीन मुद्दे मांडत आपले चौकीदार चेतन भगत यांच्यापेक्षा ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ पुस्तकाची चांगली आवृत्ती लिहू शकतात असा टोला लगावला आहे.