नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लगावला आहे. कोल्हापुरातील नेसरीच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा हे भाजपवाले करु लागले आहेत. स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता, परंतु ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपावाले करत आहेत. नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते’.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन पुकारलं असून नेसरी येथील जाहीर सभेने दुस-या दिवसाची सुरुवात केली. ‘अरे किती महापुरुषांचा अपमान कराल. किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान…त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

सत्तेत असलेल्या भाजपावाले ट्रिपल तलाक, सबसिडी यावर चर्चा करतात. परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी विचारला.