महाराष्ट्राशेजारी असलेल्या तेलंगण या छोट्या राज्यानेही त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. तसेच मोफत वीजही दिली. महाराष्ट्रात फक्त कर्जमाफीची घोषणा झाली. अंमलबजावणीच्या नावाने सगळी बोंब आहे अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच लवकारत लवकर सरकारने सरकसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणीही केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १६ जानेवारीपासून मराठवाड्यात हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. ही हल्लाबोल यात्रा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आहे. याच यात्रेच्या पूर्वतयारीसाठी धनंजय मुंडे नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. कर्जमाफी जाहीर केली आहे मात्र अंमलबजावणी कधी केली जाणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

नांदेडमध्ये धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकऱ्यांना दिलेली वाढीव वीज बिले मागे घेण्याचीही मागणी त्यांनी केली. कापसावरच्या बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानानंतर जाहीर करण्यात आलेली मदत फसवी आहे असा आरोप त्यांनी केला. बियाणे विकणाऱ्या कंपन्या मदत करत नाही. त्यांनी थेट मोन्सेटो कंपनीकडे बोट दाखवले आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? असा खोचक प्रश्नही धनंयज मुंडे यांनी विचारला. हल्लाबोल यात्रेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील लोहा, उमरी आणि माहूर या तीन ठिकाणी सभा होणार असल्याचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

या पत्रकार परिषदेस माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, आ.विक्रम काळे, माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, शहराध्यक्ष डॉ.सुनिल कदम, विक्रम देशमुख, फिरोज लाला, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.

याआधीच रविवारी धनंजय मुंडे यांनी भीमा कोरेगावच्या हिंसाचारावरून सरकारला धारेवर धरले होते. भीमा कोरेगाव प्रकरण हे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली होती. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे.