महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधत पंढरपुरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. धनगर समजाच्या आरक्षणाबाबत जलदगती न्यायालयात खटला लढवावा,एस.टी.चे प्रमाणपत्र मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी धनगर समाजाने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यातून जवळपास हजारहून धनगर बंधू,भगिनी उपोषणात सहभागी झाले आहेत.

धनगर समाजाच्या वतीने एसटी आरक्षणासाठी निर्णायक लढा सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी आज हजारोंच्या संख्येने असणारा धनगर समाज पंढरपुरात एकत्र आला होता. या आंदोलनाचा प्रारंभ येथील होळकर वाडयातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयांस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यानंतर नामदेव पायरी येथे धनगर समाजाच्या वतीने विठोबास आरक्षणासाठी साकडे घालण्यात आले.

यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयास आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास अभिवादन करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली.

उपोषणाच्या प्रारंभी संपूर्ण पंढरीचा परिसर हा धनगरी गजी ढोलच्या तालात रंगला गेला होता. या उपोषणास एकूण ११ व्यक्तींनी सुरुवात केली. यामध्ये दौंडचे पांडुरंग मेरगळ ,अहमदनगर जिल्हयातील विजय तमनर आणि राजेंद्र तागड , मुंबईचे सुरेश होलपुंडे ,नांदेडचे नागोराव बारसे , प्रकाश थाडके , हिंगोलीचे गंगाप्रसाद खारोडे , सांगोल्याचे धनाजी बंडगर ,माळशिरसचे किशोर सुळ आणि पंढरपूरचे माउली हळणवर या लोकांनी उपोषणास आज सुरूवात केली. विशेष म्हणजे यातील काही उपोषणकर्ते २०१४  साली बारामतींच्या उपोषणातही सहभागी होते.येथील टिळक स्मारक मैदानावर हे उपोषण सुरु आहे.

धनगर समाजाचा निर्णायक लढा सुरू करण्यात आला आहे. या आंदोलना दरम्यान सरकारने जलदगती न्यायालयात  आमचा खटला चालवावा. तसेच आमच्याशी चर्चा करावयाची असेल तर खुदद मुख्यमंत्र्यांनी करावी. जोपर्यत धनगर समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. सध्या समाजाला तारणारा कुठलाच नेता नाही. त्यामुळे जगाला तारणाऱ्या विठोबाच्या दरबारी आम्ही उपोषण सुरू केले आहे.