तापमानाचा पारा ३६ वर स्थिरावल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच आता उन्हाच्या चटक्याबरोबरच भारनियमनाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परळी शहरातील बहुतांश ठिकाणी चक्क अठरा-अठरा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. विशेषत: विद्युत मोटारी सुरू झाल्याने इमारतीतील रहिवाशांचे पाण्यासाठी मोठाच त्रास सहन करावा लागला. जनतेच्या या भारनियमनाच्या अडचणीसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे कंदिल घेऊन आंदोलनाला उतरले होते. भारनियमनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्यावतीने परळीत कंदिल मोर्चा काढण्यात आला होता. सोमवारी रात्री मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह कंदिल मोर्चा काढला. धनजंय मुंडे यांनी याची माहिती आपल्या ट्विटरवर दिली.

आज कंदिल घेऊन आलोय, उद्या जनता मशाली घेऊन येईल, असा इशारा यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारला दिला आहे. परळी सारख्या शहरात नागरिकांना अठरा-अठरा तास अंधारात रहावं लागत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, असंही ते यावेळी म्हणाले. भाजपाने जनतेला फसवलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या भाजपा सरकारला हाकलायचं आहे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

 वाढत्या उन्हामुळे असह्य झालेल्या नागरिकांनी एसी, कूलर, पंखे, फ्रीज या विजेच्या उपकरणांचा वापर वाढविला आहे. परिणामत: विजेच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढून भारनियमनाच्या संकटाला शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. तपमान वाढलेले असतानाच वीज जात असल्याने घामाळलेल्या परळीकरांना उकाडा सहन करण्यापलीकडे पर्याय उरत नाही.

दरम्यान बीड जिल्हा रूग्णालयातील एका प्रकरणावरही मुंडे यांनी संताप व्यक्त केला.  स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला झोळी करुन रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या आरोग्य खात्यावर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.  “महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का”? असा संतप्त प्रश्न मुंडे यांनी विचारला आहे.