२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आश्वासन देत सुटलो असा गौप्यस्फोट केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत आपण 15 लाखांचा उल्लेख केलाच नव्हता असं सांगितलं आहे. दिल्लीमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने चुकीचं भाषांतर करत चुकीची बातमी झापल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, ‘दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने पूर्ण निराधार वृत्त छापलं. त्यावेळी मी ना मोदींचं, ना भाजपाचं नाव घेतलं, ना मी 15 लाखांचा उल्लेख केला’.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्ती करण्याची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना अशी घोषणा करु नका, आर्थिक दृष्टीने यामध्ये खूप अडचण येईल असं सांगितलं होतं. यावर त्यांनी मस्करीत मला म्हणजे तुम्हाला आपलं राज्य येईल असा विश्वास आहे असं म्हटलं. त्यावर मी आलं तर आपल्याला पूर्ण करावं लागेल असं म्हटलं’.

राहुल गांधींनी आधी मराठी शिकून घ्यावं, नितीन गडकरींचा पलटवार

२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, त्यामुळं आश्वासनं दिली: नितीन गडकरी

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘अनेक वर्ष विरोधी पक्षात असल्याने जेव्हा आम्ही जाहीरनामा तयार करायचो तेव्हा अनेक घोषणा करायचो, कारण आम्हाला सत्तेत असण्याचा अनुभव नव्हता’.

राहुल गांधींना टोला –
हा संपूर्ण कार्यक्रम मराठीत होता. राहुल गांधींना कधीपासून मराठी कळायला लागलं, त्यांनी कोणाकडून तरी मराठी शिकून घेतलं पाहिजे. काहीच न समजता त्यांनी माझं ट्विटरवर अभिनंदन केलं. जे मी बोललोच नव्हतो.

मी दिलेली आश्वासनं पूर्ण करतो आणि ती केली आहेत. कार्यक्रमात जो टोलचा उल्लेख झाला ते आश्वासनही महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. ना तिथे मोदींचं नाव होतं, ना भारत सरकार, ना 15 लाखांचा उल्लेख होता. कृपया तुम्ही चुकीच्या बातम्यांनी प्रभावित होऊ नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.